मंत्रालय परिसरातही पाणी साचले   

मुंबई : रविवारी रात्रीपासून कोसळणार्‍या पावसाचा फटका राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असणार्‍या मंत्रालयाला देखील बसला. आठवडयाच्या पहिल्याच दिवशी कामावर येणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना सकाळी गुडघाभर पाण्यातून मंत्रालय प्रवेशासाठी वाट काढावी लागली. मंत्रालयाच्या गार्डन गेट, आरसा गेट येथे चांगलेच पाणी साचले होते. पुढच्या चोवीस तासांत पडणार्‍या पावसाची शक्यता लक्षात घेता मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालयातील कर्मचार्‍यांना सोमवारी सायंकाळी चार वाजताच लवकर घरी जाण्याची मुभा देण्यात आली. हवामान खात्याने पुढच्या चोवीस तासांसाठी मुंबई तसेच मुंबई उपनगरसाठी ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. पावसामुळे लोकल ट्रेन बाधित झाल्या आहेत. मंत्रालयात कामास येणारे शासकीय कर्मचारी हे लांबून प्रवास करून येत असतात. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालय तसेच इतर शासकीय कार्यालये दुपारी चार वाजताच सोडण्याचा निर्णय घेतला. सामान्य प्रशासन विभागाने तसे परिपत्रकही जारी केले.

अजित पवारांकडून पुणे जिल्ह्यातील गावांची पाहणी

राज्याच्या अनेक जिल्ह्यांत सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पहाटेपासूनच बारामती, इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील गावांना भेट देऊन दिवसभर परिस्थितीची पाहणी केली.   पवार यांनी पुणे ग्रामीण भागातील गावांचा दौरा करत असतानाच, मंत्रालयातील राज्यस्तरीय आपत्ती नियंत्रण आणि  व्यवस्थापन केंद्राकडूनही अन्य जिल्ह्यांतील पाऊस, धरणांची स्थिती, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पाऊस होत असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्ह्याधिकार्‍यांशी दूरध्वनीद्वारे चर्चा करुन परिस्थितीची, मदत कार्याची माहिती घेतली.  शेतीचे, पिकांचे, पशुधनाचे, घरांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्याचे निर्देश त्यांनी दिले. राज्य आणि जिल्हास्तरीय अधिकार्‍यांनी सतर्क रहावे, परस्परांच्या संपर्कात राहून समन्वयाने, सहकार्याने बचाव, मदतकार्य तात्काळ राबवावे, असे निर्देशही पवार यांनी  अधिकार्‍यांना दिले.

आपत्ती व्यवस्थापन केंद्र २४ तास सुरू ठेवा : शिंदे

राज्यात अनेक भागांत मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी  ठाणे,  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे, मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा करून मदत कार्याबाबत विविध  सूचना दिल्या. या सर्व जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे २४  तास सुरू राहतील हे पाहावे. तसेच, अधिकार्‍यांनी अतिशय काळजीपूर्वक आणि दक्ष राहून काम करावे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ नये आणि कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये, यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी, असे शिंदे यांनी सांगितले.

आरोपांचा गडगडाट; विरोधकांची सरकारवर टीका

पहिल्याच पावसात मुंबईची दैना उडाल्याने, बहुचर्चित भुयारी मेट्रो पाण्यात गेल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. गेली तीन वर्ष मुंबई महापालिका त्यांच्या हातात आहे. या काळात केवळ भ्रष्टाचार झाल्यामुळे मुंबई बुडल्याचा आरोप उद्धव यांनी केला. तर, मुंबईत अनेक ठिकाणी प्रथमच पाणी साठले असून, भ्रष्टाचाराच्या खड्ड्यांमध्ये ही स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.  नालेसफाईची कामे नीट झालेली नाहीत. महापालिकेने मान्सूनपूर्व बैठका घेतलेल्या नाहीत. स्वत:ला विजनरी, इन्फ्रा मॅन बोलणारे कुठे गायब आहेत? असा सवाल आदित्य यांनी केला.  भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा हा माजी नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांना फोडण्यात जात आहे. मुंबईकरांचे आज जे हाल झाले, त्यातून काढलेला हा पैसा आहे. दोन आठवड्यांपूर्वी मेट्रो-३ चे उद्घाटन झाले. मात्र, तिथे आज पाणी साचले आहे.
 

Related Articles